|| जय मल्हार ||

।। माळेगाव यात्रा ।।

जिल्हा परिषद, नांदेड

ऐतिहासिक महत्व

"माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील 5888 लोकसंख्या असलेले एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे. नांदेडपासून सुमारे 57 कि.मी. अंतरावर नांदेड ते लातूर महामार्गावर वसलेले आहे."

खंडोबाचे मंदिर

माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.

खंडोबाची यात्रा

खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.
 उत्‍तम जागा पाहूणी, मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी" या जयघोषात, यळकोट यळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करत पारंपरीक पध्‍दतीने श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेला सुरुवात होते. तसेच भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतो.  माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.
 भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, कौटुंबिक प्रश्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.  भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव घ्यावा! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्हारी, मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी खंडोबाला वेगवेगळी नावे आहेत. खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये मिळून एकूण बारा स्थाने आहेत. त्यांपैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. श्रीक्षेत्र माळेगावचा खंडोबा म्हणजे लोकांचा देव. माळेगावचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा हेच आहे, मराठवाड्याची ती सर्वात मोठी ग्रामदेवता आहे. तिच्या नावाने माळेगावला मोठी यात्रा भरते. खरीपाची कापणी झाली की शेतकरी आणि कष्टक-यांना वेध लागतात ते माळेगाव यात्रेचे…

पशुधनाचा व्यापार

 माळेगाव यात्रा उत्कृष्ट प्रतीच्या पशुधनाच्या व्यापारासाठी देशात प्रसिध्द आहे. नांदेडचे स्थानिक लाल कंधारी वळू हे पशुप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असते. तेथील घोड्यांचा व्यापारही विशेष प्रसिध्द आहे. उंट, गाढव, कुत्रे, शेळ्या यांच्यासारखे पशुधन; त्यांचा बाजार व प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन ठरलेल्या आणि दुर्मीळ असलेल्या देवणी व लालकंधारी गायी व वळूंचे प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण असते. आयुष्यात पाहिले नसतील एवढे वेगवेगळे घोडे काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचे पाहायला मिळतात. पंचवीस हजार रुपयांचा कारवान जातीचा कुत्रा देखील पाळायला मिळाला. चांगला घोडा कसा ओळखायचा त्याच्या पाच खुणा-त्याचा बाहत्तर खोडया कशा, त्याचा डौल…अशा अनेक गोष्टी तिथे पाहता व शिकता आल्या.  मोठमोठ्या राजकीय व्यक्ती त्यांच्या त्यांच्या खास अशा घोड्यांसोबत पाहावयास मिळतात. सुग्या-मुग्यांची यात्रा, हौसे-गवसे-नवशांची यात्रा, तृतीयपंथीयांचे माळेगाव, उचल्यांचे माळेगाव अशा विविध प्रकारे माळेगाव यात्रेचा उल्लेख होतो. याला ‘हिजड्यांचे माळेगाव’ असेही म्हणतात. इथं घोड्यांचा मोठा बाजार भरतो. राजस्थान, पंजाब, हरयाणा, गुजरात येथून घोडे येतात. त्यांच्या खरेदीविक्रीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते म्हणून या गावाला ‘घोडे माळेगाव’ असेही म्हणतात. घोड्याप्रमाणे उंट, गाढवे यांचाही बाजार भरतो, म्हणून ‘उंटाचे माळेगाव’, ‘गाढवाचे माळेगाव’ असेही उल्लेखले जाते. जत्रेला जाऊन मजा करावी या हौसेने माळेगावी येणा-या लोकांमुळे ‘हौशांचं माळेगाव’, नवस फेडणा-या लोकांमुळे ‘नवश्यांचं माळेगाव’, काहींना काही गवसते, मिळते म्हणून ‘गवशांचे माळेगाव’ असेही संबोधले जाते. विशेषणे विविध कार्यक्रमाला लावली जातात. यात्रेला जे जेजुरीत मिळत नाही, ते तिथे मिळते म्हणे! सर्व जातिधर्मांचे श्रद्धास्थान, तमाशेवाले, लोकनाट्यवाले, तळागाळातील व पिढ्यानपिढ्या भटके जीवन जगणा-या जाती-जमातीचे आप्तस्वकीय एकत्र येण्याचे ते ठिकाण आहे. वर्षभराचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक करारमदार खंडेरायाच्या दरबारात होतात. पुढील वर्षीच्या भेटी, आश्वासने, सोयरिकी, देवाणघेवाण, खंडेरायाला साक्ष ठेवून मोठ्या प्रेमभावाने केल्या जातात. वैदू, गोसावी, मसनजोगी, घिसाडी, गारूडी, डोंबारी, नंदीबैलवाले, वासुदेव, जोशी कुडमुडेवाले यांची जातपंचायत यांसारख्या अनेक घटना हे या यात्रेचे आकर्षण आहे.

नाईक कुटुंबाचा इतिहास

 माळेगावपासून वीस किलोमीटरवर रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. नागोजी नाईक यांनी या ‘माळेगाव जत्रे’चा लौकिक नावारूपाला आणला. नागोजी नाईक हे इसवी सन 1777 साली (राजा महिन्द्र हिंदुमती ऊर्फ कबीरसिंघ गोपालसिंघ यांच्या वंजारवाडीच्या नाईकांचे बंड मोडून काढले. तेव्हा त्यांना निजामाकडून ‘काळा पहाड’ हा किताब मिळाला होता.) कंधारजवळील भोसी येथील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्टीच्या दिवशी भोसीकर कुटुंब आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात. ते पागोटे मार्गशीर्ष अमावस्येच्या यात्रेपर्यंत मंदिरात ठेवतात. भोसीकर कुटुंबीय चंपाषष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. यात्रा पूर्वी महिनाभर भरत असे. आता पाच दिवस भरते. ज्येष्ठा मूळ नक्षत्रावर देवस्वारी निघते. देवस्वारीचा मान नागोजी नाईकांनंतर बापुसाहेब नाईक, हैबतराव नाईक, मल्हार नाईक, गणपतराव नाईक… असा हा वारसा आता संजय नाईक चालवत आहेत. हेमाडपंथी धाटणीचा गाभारा असलेले ‘खंडोबा’ व ‘म्हाळसा’ यांचे मंदिर आहे. बाजूला ‘बाणाई’चे स्वतंत्र मंदिर आहे. तेथील मंदिरातील पुजा-यांना ‘जहागिरदार’ म्हणतात. जत्रेला सातशे वर्षांची परंपरा लाभली आहे.  माळेगावची एक लोककथा-जत्रेबद्दल एक लोककथा आहे, ती अशी- बिदरचा एक वाणी तांदळाचा व्यापार करत असे. तो मजल-दरमजल करत माळेगावला आला व तिथेच त्याचा मुक्काम पडला. त्याच्यासोबत तांदळाच्या गोणी पाठीवर असलेली गाढवे होती. दुस-या दिवशी पुढच्या प्रवासाला निघताना एका गाढवाच्या पाठीवरील गोण फार जड वाटू लागली. ती जेव्हा सोडून पाहण्यात आली तेव्हा ती मध्ये दोन तांदूळ सापडले. ते अंगठ्याएवढे मोठे होते. ते तांदूळ म्हणजेच खंडोबा व त्याची पत्नी म्हाळसा. त्यांची प्रतिष्ठापना तिथेच केली गेली. तेव्हापासून जत्रा भरत आलेली आहे. जत्रेचे संयोजन कंधार पंचायत समिती व नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडे 1968 सालापासून आले. जत्रा दोन-तीन माळांवर आणि बदकलात बसलेली असल्यामुळे तिचे रूप मानवी नजरकक्षेत सामावले जाऊ शकते व चटकन लक्षातही येते. लोकसाहित्यावर संशोधन करणा-यासाठी; ‘माळेगावची जत्रा’ हा लोकसंस्कृतीचा व लोककलांचा महाकोश आहे.

भुलई

 बायका पंचमीच्या सणाला ‘भुलई’ म्हणत असतात. त्यांतील एका भुलईनुसार ‘काळा पहाड’ ऊर्फ नागोजी याचे मोठेपण ‘कंधार’च्या किल्लेदारास पाहवले नाही. त्याने नागोजीस तोफेच्या तोंडी दिले. नागोजीच्या गोदाबाई व राधाबाई या दोघी बायकांनी वीर नागोजीच्या शरीराचे मांसाचे तुकडे वेचून त्यांना चिता रचून अग्नी दिला. आणि कंधारच्या राजास ‘तुझा वस बुडू दे’ असा शाप दिला. तेव्हा खंडोबा(देवाने) त्या दोघींना स्वप्नात येऊन अभिवचन दिले, की माझ्या पालखीच्या पुढे तुझी पालखी राहील, अशी आख्याइका आहे. मिर्जा यांच्या ‘तारीख-ए-खंदार’मध्ये अशा कथानकाच्या काही नोंदी सापडतात.  येळकोट येळकोट… जय मल्हार!! येळकोट येळकोट… जय मल्हार!! शिवा मल्हारी येळकोट येळकोट घे… अशा गगनभेदी जयघोषानं माळेगावचा टापू दुमदुमून जातो. आकाशात बेलभंडाराची उधळण होते. खंडोबाची देवसवारी आणि ‘रिसनगाव’च्या ‘नाईकांच्या’ पालखीच्या वाटेवर हजारो भगत आपल्या देहाची पायघडी करून अंथरतात. त्यांच्यावरून पालख्या जातात. मग भगतांचा देह धन्य धन्य होतो!  माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.  नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबा यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून दशकांपासून ओळखल्या जाते. दरम्यान या यात्रेस घोड्याचे माळेगाव तर गमतीने उचल्याचे माळेगाव म्हणून ओळखल्या जाते. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा,गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेशसह देशभरातून उंट, घोडे,गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल घेऊन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात. यात्रेतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. ही यात्रा पशु बाजारपेठेसाठी सुध्दा प्रसिद्ध आहे.

देवस्थाने व शिलालेख

 महाराष्ट्र राज्याची वैभव संपन्न सांस्कृतिक परंपरा व मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 57 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते. याठिकाणी महामार्गा शेजारी खंडोबा मंदिराची मोठी कमान नजरेला पडते. त्या ठिकाणाहून उजव्या बाजूला आत गेल्यानंतर भव्य मंदिर, परिसर यात्रेकरुंनी दुमदुमलेला दिसतो. माळेगाव येथे पूर्व-पश्चिम असे एक मोठे आवार बांधले आहे. या आवाराच्या पूर्वाभिमुख महाद्वार आहे. या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर खंडोबाचे मंदिर दिसते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. आठराव्या शतकातील हा शिलालेख मराठी भाषेत आहे. मल्हारी, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबादेवाची महाराष्ट्रासोबत कर्नाटक राज्यातही बारा देवस्थान आहेत  श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक, यात्रेकरु, व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन जागृत दैवत खंडोबारायांच्या समोर भरवली जाते. यात्रेचे व्यवस्थापन नांदेड जिल्हा परिषद नियोजनबद्ध करते. देवघरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. या मूर्तीच्या देवघरासमोर एक सभागृह बांधले आहे. सभागृहाच्या मुख्यद्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. 18 व्या शतकातील हा शिलालेख मराठीत भाषेत आहे. माळेगाव यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते.